मनोज जरांगे यांना पुन्हा धक्का, मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली...

Foto
मुंबई  : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. रविवारी आझाद मैदान पोलिसांनी पहिला अर्ज फेटाळल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावतीने नव्याने उपोषणाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत दुसऱ्यांदाही या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. 

गणेशोत्सवानंतर जरांगेंच्या उपोषणाला आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी परवानगी देण्यात येईल, असं पत्रही मुंबई पोलिसांनी दिल्याची माहिती आहे. मात्र, सलग दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

19 सप्टेंबरच्या उपोषणावर टांगती तलवार
मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. 15 सप्टेंबर रोजी ते अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. परंतु, पोलिसांनी लागोपाठ दोनदा परवानगी फेटाळल्याने 19 तारखेच्या या उपोषणावर आणि मुंबई मार्चवर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.

पोलिसांनी परवानगी का नाकारली?
गेल्या वर्षीचा अनुभव : गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5,000 वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते.

गणेशोत्सवाचा काळ : 14 सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. या काळात मुंबईत भाविकांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई अतिशय संवेदनशील मानली जाते.

आझाद मैदानावरील जागेची मर्यादा : आझाद मैदानातील 7,000 चौरस मीटर जागेत नियम 2025 नुसार कमाल 5,000 आंदोलकच समावू शकतात. मात्र जरांगेंनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक आणि रुग्ण सेवा : लाखो आंदोलक मुंबईत आल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये (जी.टी., कामा, सेंट जॉर्ज, बॉम्बे हॉस्पिटल), न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे एकटे उपोषणाला बसणार?
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे नेमके काय करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी आपण एकट्याने उपोषणाला जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला जाणार नसून एकट्याने उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदाही कायदेशीर आणि सुरक्षेची कारणे देत उपोषण नाकारल्यामुळे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहून मुंबई गाठणार की उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.